पुणे:
कात्रज तलाव परिसरातील ‘कात्रज कट्टा’ हॉटेलसमोरील रस्त्यावर एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणाची लोखंडी तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असून, याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ७ जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश रवींद्र माळवे (वय १७, रा. कात्रज गाव, पुणे) असे खून झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मित्र गणेश रामदास चव्हाण (वय २२, रा. गुजर वस्ती, कात्रज) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार (फिर्याद) दिली आहे.
नेमकी घटना काय घडली? पोलीस माहितीनुसार, ही घटना २१ जुलै २०२६ रोजी रात्री १०.०० वाजताच्या सुमारास घडली. फिर्यादी गणेश चव्हाण आणि त्याचा मित्र गणेश माळवे हे दोघे दुरुस्तीसाठी दिलेला मोबाईल फोन परत घेण्यासाठी कात्रज कट्टा हॉटेलसमोरील रस्त्यावर थांबले होते.
त्याच वेळी पूर्ववैमनस्याच्या रागातून आरोपींनी एकत्र येत हत्येचा नियोजनबद्ध कट रचला. जुन्या भांडणाची कुसपत काढून आरोपींनी गणेश माळवे याच्यावर लोखंडी धारदार हत्यारांनी डोक्यावर, चेहऱ्यावर आणि हातावर प्राणघातक वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या गणेश माळवे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल या प्रकरणाप्रकरणी पोलिसांनी खालील ७ जणांवर गुन्ह्याची नोंद केली आहे:
राज गौतम
प्रथमेश दामगुडे
राजप्पा पाटील
साई बोंडारे
कृष्णा पांजणझाळ
आकाश गायकवाड
सागर खरात
(सर्व रा. कात्रज, पुणे)
या आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३ (हत्या), ६१, १८९(२), १८९(४), १९०, १९१, १९१(२), १९१(३) सह आर्म ॲक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपआयुक्त (परीमंडळ ०२) मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी रात्रीच घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) मोहिते करत आहेत. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.









